आपणाला या लेखाचे शीर्षक वाचून धक्का बसला असेल. किंवा हा क्लिकबेटचा प्रकार वाटला असेल. पण हे घडले आहे. प्रसंग तसा मजेशीरच होता. या लेखा...
आपणाला या लेखाचे शीर्षक वाचून धक्का बसला असेल. किंवा हा क्लिकबेटचा प्रकार वाटला असेल. पण हे घडले आहे. प्रसंग तसा मजेशीरच होता. या लेखासोबत जो फोटो दिसत आहे, त्या फोटोतील व्यक्ती थोड्या वेळासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा नवरा झाली होती. या व्यक्तीचे नाव आहे विठोबा कृष्णा वाघमोडे. ते सांगली जिल्ह्यातील पारे या गावचे रहिवासी होते. त्यांच्या जीवनात एक प्रसंग असा आला की त्या प्रसंगात त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांचा नवरा व्हावे लागले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्वातंत्र्यसंग्राम लढत असताना बराच काळ भूमिगत अवस्थेत घालवावा लागला. पोलीस सतत त्यांच्या मागावर असायचे. अनेक वेळा त्यांनी पोलिसांना चकवल्याचे किस्से आहेत. त्या काळात पारे हे गाव स्वातंत्र्याच्या चळवळीचे एक केंद्र झाले होते. या गावात नाना पाटील अनेक दिवस मुक्कामी असायचे. पारे गावातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. नाना पाटील या गावात दिवसभर लपून राहायचे आणि रात्री त्यांची सरकार विरोधातील चळवळ चालायची. पारे गावातील लोक त्यांना जीवापाड जपायचे. त्यांची काळजी घ्यायचे. पोलिसांपासून त्यांना सुरक्षित ठेवायचे. त्यामुळेच नाना पाटील पोलिसांच्या हाती लागत नव्हते. असेच एकदा त्यांना पारे येथून जतला जायचे होते. त्यासाठी पारे गावातील विठोबा कृष्णा वाघमारे यांनी स्वतःची बैलगाडी जुंपली. त्यांनी नाना पाटलांना गाडीत ऊन लागू नये म्हणून गाडीला छत बांधून सावली केली होती. सावलीचा तर हेतू होताच; पण नाना पाटील कोणाच्या नजरेस पडू नयेत हाही एक महत्त्वाचा हेतू होता. ते नाना पाटलांना आपल्या बैलगाडीतून घेऊन निघाले. गाडी प्रवास करत भिवघाटावर आली. भिवघाटावर पोलीस थांबले होते. नाना पाटील नेहमीच सावध आणि तयार असायचे. ते साडी नेसून, कुंकू लावून, बांगड्या घालून गाडीत बसले होते. पोलिसांनी गाडी अडवली आणि विठोबा वाघमोडेंना दरडावून विचारले, "कुठे चाललाय?"
त्यावर वाघमोडे यांनी सांगितले, "सासरवाडीला चाललूय."
"गाडीत कोण आहे?" पोलिसांनी दुसरा प्रश्न विचारला.
"कोण न्हाय सायब. माझ बिऱ्हाड हाय."
पोलिसांनी गाडी अडवली आहे हे नाना पाटलांच्या लक्षात आले होतेच. ते पोलिस आणि विठोबा वाघमोडे यांच्यातील संवाद ऐकतच होते. पोलिसांनी गाडीत डोकावून पाहिले. नाना पाटलांनी गाडीत हालचाल करत हातातल्या बांगड्या वाजवल्या. बांगड्यांचा आवाज ऐकल्याबरोबर पोलीस मागे सरकले. आणि नंतर गाडीला पुढे जाण्यास परवानगी दिली.
त्या प्रसंगात विठोबा वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखत गाडीत माझे बिऱ्हाड असल्याचे सांगितले. ते थोड्या वेळासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांचा नवरा झाले. त्यांनी हे केले नसते तर पोलिसांनी क्रांतिसिहांना पकडले असते. विठोबा वाघमारे हे पारे गावामध्ये एक सज्जन माणूस म्हणून ओळखले जायचे. ते वारकरी संप्रदायाचे सच्चे पाईक होते. गावात पारायण असले की सात दिवस एकटेच वीणा घ्यायचे. शांत, नम्र आणि सत्शील असणाऱ्या या माणसाचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मोलाचे होते. त्याची इतिहासात कुठे नोंद नाही. ग्रामीण भागातील अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांची कामे काळाच्या उदरात कुठल्याही नोंदीविना गडप झालेली आहेत. इतिहासलेखन करणाऱ्या काही कलमकसायांनी तर जाणीवपूर्वक त्यांना दुर्लक्षित ठेवले आहे. विठोबा वाघमोडे यांचे योगदान भलेही कोणी लिहून ठेवले नसेल; पण त्यांना काही काळ का होईना क्रांतिसिंह नाना पाटील यांचा नवरा होण्याचे भाग्य लाभले. एका महामानवाशी त्यांचे नाव कायमचे जोडले गेले.
अशा सामान्य आयुष्य जगणाऱ्या अनेक लोकांनी आयुष्यभर नाना पाटलांना जपले. संकटातून वाचण्यास त्यांना मदत केली. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण नाना पाटलांना पोलिसांच्या हाती लागू दिले नाही. त्यांची इतिहासात कुठेही नोंद नाही. सरकार दरबारीही नोंद नाही. स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन त्यांना कधीच मिळाली नाही. पण त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात जे योगदान दिले आहे, ते खूप मौल्यवान आहे.
COMMENTS