डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी केवळ अडीच वर्षातच पूर्ण...
डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. तीन वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी केवळ अडीच वर्षातच पूर्ण केला. त्याकाळी विद्यापीठात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला पीडब्ल्यूडी विभागात थेट नोकरी मिळत असे. त्यामुळे कॉलेजच्या गुणपत्रिकेबरोबरच मुंबई पीडब्ल्यूडी विभागाकडून नेमणुकीचे पत्र त्यांच्या हातात पडले. इंग्रज अधिकारी कोणत्याही उच्च पदावर शक्यतो इंग्रज व्यक्तीचीच नेमणूक करत. पण विश्वेश्वरय्यांनी इंग्रजांना त्यांचा हा अलिखित नियम बदलवायला भाग पाडले. त्यांची नाशिकमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक झाली. त्यांना नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच धुळे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर काम करण्यास सांगण्यात आले. धुळे जिल्ह्यातला पाण्याचा बिकट प्रश्न सोडवण्यासाठी विश्वेश्वरय्यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली. त्यांना पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण करायचे होते. पण काम सुरू असतानाच अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे खोदलेले खड्डे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून गेले आणि त्यावर वाळूचे थर बसायला लागले. हे थर काढून टाकण्यासाठी जास्तीचे काम करावे लागू लागले आणि कामाचा खर्चही वाढला. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. अशा परिस्थितीत आपण काम चार महिने थांबवून नंतर सुरू करावे, अशा अर्थाचे पत्र विश्वेश्वरय्यांनी आपल्या आपल्या वरिष्ठांना लिहिले. पण सरकारी पद्धतीप्रमाणे वरून उत्तर आले, 'ठरलेल्या मुदतीत काम करणे शक्य नसेल तर नोकरीचा राजीनामा द्या. आम्हाला फुकटचे सल्ले देण्याचा शहाणपणा करू नका.'
राजीनामा देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण हार मानणे विश्वेश्वरय्यांच्या रक्तातच नव्हते. त्यांनी आपल्या वरिष्ठांचे आव्हान स्वीकारले आणि विचार करू लागले.
रस्त्यावरून चालत असताना त्यांना दिसले की एक मुलगा रबरी चेंडू जमिनीवर जोरात फेकण्याचा खेळ खेळत होता. तो मुलगा जेवढ्या ताकदीने चेंडू खाली फेकायचा तेवढ्याच वेगाने तो चेंडू वर उसळून त्या मुलाच्या हातात यायचा. जसा हा चेंडू उसळून वर येतोय तसे पाणीही उसळून वर येते हे त्यांना आठवले. न्यूटनचा गतीचा नियम त्यांना डोळ्यासमोर दिसायला लागला. सायफन उर्फ वक्रनलिका हा शाळेत शिकलेला प्रयोग ही त्यांना आठवला आणि त्यांना उत्तर सापडले. हे काम सायफन पद्धतीचा उपयोग करून करायचे त्यांनी ठरवले. त्यांनी कामाचा आराखडा कागदावर उतरवला. आणि आपण जबाबदारीमध्ये काही बदल करून काम सुरू केल्याचे त्यांनी वरिष्ठांना कळवले. सतत कोसळणाऱ्या पावसात उभे राहून विश्वेश्वरय्या रोज काम करून घेत होते. कोसळणाऱ्या पावसाची फिकीर न करता त्यांनी वेळेच्या आतच ते काम पूर्ण केले. दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा खानदेश आता दुष्काळी राहणार नव्हता. ठरलेल्या बजेट पेक्षा फक्त पाच टक्के खर्च जास्त लागला होता. हे सगळे काही त्यांनी वरिष्ठांना कळवले. पण सरकारी नोकरीचा पुरता दणका अजून विश्वेश्वरय्यांना कळलेलाच नव्हता. सरकारी मंजूरीशिवाय काम केलेच कसे? या आशयाची पत्रे येणे सुरू झाले. इतकेच नव्हे तर अशा प्रकारे बेकायदेशीरपणे केलेल्या कामाचा खर्च विश्वेश्वरय्यांच्या पगारातून वसूल केला जाईल, अशाही प्रकारची पत्रे त्यांना मिळाली. या परिस्थितीचा परिणाम त्यांनी आपल्या कुठल्याही कामगारावर वा सहकाऱ्यांवर होऊ दिला नाही. आपला आत्मविश्वास शाबूत ठेवून ते शांत राहिले. आपल्या कुठल्याच धमकीचा परिणाम विश्वेश्वरय्यांवर होत नाही हे पाहून त्यांचा वरिष्ठ अधिकारी लॉरेन्स चक्रावलाच. शेवटी त्याने स्वतःच धुळ्याला प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहायचे ठरवले. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊनच विश्वेश्वरय्याची फजिती करायची, असे ठरवून त्याने प्रवासाची तयारी केली. प्रत्यक्ष कामात विश्वेश्वरय्यांनी केलेले बदल त्यांच्या एका सहकार्याने गुपचूपपणे वेळोवेळी लॉरेन्स याला कळवले होते. त्यामुळे आता विश्वेश्वरय्याची फटफजिती होणार या खुशीत तो सहकारी होता.
ठरल्याप्रमाणे लॉरेन्स आला. त्याला विश्वेश्वरय्यांनी काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पण कामात काय आणि कसे बदल केले, हे सगळे सविस्तर सांगितले. त्यांनी सायफन पद्धतीचा प्रयोग करून दाखवण्यासाठी आपल्या सहकाऱ्याला साहित्यासह बोलवले. ज्या व्यक्तीने लॉरेन्सला गुपचूप माहिती पुरवली होती त्या व्यक्तीने सायफनचा प्रयोग यशस्वी होऊ नये म्हणून पाईपला छिद्र पाडून ठेवले होते. साहजिकच तो प्रयोग अयशस्वी ठरणार होता. पण हुशार विश्वेश्वरय्या यांनी आपल्या दुसऱ्या एका सहकाऱ्याला प्रयोगाच्या साहित्यासह तयार राहायला सांगितले होते. तो प्रयोग लगेचच यशस्वी झाला. प्रयोग फसावा म्हणून पाईपला छिद्र पडणारा सहकारी मात्र खाली मान घालून चालता झाला. या प्रयोगाने लॉरेसच्या मनातील सगळ्या शंका मिटल्या. त्याने विश्वेश्वरय्यांनी केलेले बदल मंजूर केले. मात्र सरकारी नियम हातात घेऊन असे बदल करायचे नसतात, असेही त्याने विश्वेश्वरय्यांना समजावले. पण विश्वेश्वरय्यांनी 'काम करताना जनकल्याणासाठी नियमात बदल करावा लागला तरी मी तो करेन', असे बाणेदारपणे उत्तर दिले. कारण नियम हेच मुळी काम चांगले होण्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी केलेले असतात ही गोष्ट त्यांनी लॉरेन्सच्या लक्षात आणून दिली.
विश्वेश्वरय्यांची खरडपट्टी काढण्याच्या उद्देशाने आलेला लॉरेन्स जाताना मात्र विश्वेश्वरय्यांच्या कर्तृत्वाने आणि बुद्धिमत्तेने भारावून गेला. परंतु सरकारी नियम तोडल्याबद्दल लॉरेन्सलाही त्याच्या वरिष्ठांना उत्तर द्यावे लागणार होते. औपचारिकता म्हणून त्याने विश्वेश्वरय्यांना एक माफीनामा लिहून द्यायला सांगितले. या माफीपत्राचा त्याच्या नोकरीवर काहीही दुष्परिणाम होणार नाही, याची हमीही त्याने दिली. पण विश्वेश्वरय्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. मी माझ्या मूल्यांवर आणि भूमिकेवर ठाम आहे आणि मी त्यांच्या विरोधात वागणार नाही. नोकरी गेली तरी चालेल; पण ज्यात काही गैर नाही अशा गोष्टीसाठी मी माफी मागणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शेवटी लॉरेन्सने आपलीच मान विश्वेश्वरय्यांपुढे झुकवली. आपण विश्वेश्वरय्याला धडा शिकवायला आलो होतो; पण स्वतःच एक धडा शिकून परत जात आहोत, हे त्याने विश्वेश्वरय्यांपुढे कबूल केले. आणि परत जाताना 'तुझ्यासारख्या बुद्धिमान आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची आम्हाला आवश्यकता आहे', असे त्याने आवर्जून सांगितले. या कामामुळे विश्वेश्वरांना संपूर्ण खानदेशात लोक ओळखू लागले. आणि आदराने त्यांचे नाव घेऊ लागले. या कामाच्या निमित्ताने विश्वेश्वरय्या यांनी इंग्रजांचे आणखी एकदा गर्वहरण केले.
COMMENTS