इंग्रजांच्या काळातली गोष्ट. एका खच्चून भरलेल्या रेल्वेत प्रवासी प्रवास करत होते. त्यातील बहुतांश प्रवासी इंग्रज होते. एका डब्यात एक भा...
इंग्रजांच्या काळातली गोष्ट. एका खच्चून भरलेल्या रेल्वेत प्रवासी प्रवास करत होते. त्यातील बहुतांश प्रवासी इंग्रज होते. एका डब्यात एक भारतीय प्रवासी आपल्या जागेवर शांतपणे बसला होता. त्याचा चेहरा गंभीर होता. सावळ्या रंगाचा तो प्रवासी अतिशय साध्या कपड्यांमध्ये होता. तिथे बसलेले इंग्रज प्रवासी त्याला मूर्ख, अशिक्षित, अडाणी असे समजून त्याची टिंगलवाळी, चेष्टा करण्यात मग्न होते. पण तो प्रवासी या टिंगलटवाळीकडे दुर्लक्ष करून अतिशय शांत बसला होता. असाच प्रवास चाललेला असताना त्या प्रवाशाने एकाएकी उठून चक्क रेल्वेची साखळी खेचली. वेगात चाललेली रेल्वे अचानक थांबली. काय झाले, हे क्षणभर कोणालाच कळेना. गाडीत असलेले इंग्रज प्रवासी या भारतीय प्रवाशावर खूप चिडले. त्याच्या या वेड्यासारख्या वागण्याबद्दल त्याला उलट सुलट सुनवायला लागले. थोड्याच वेळात तिथे रेल्वेचा गार्ड येऊन पोहोचला. एका भारतीय प्रवाशाने रेल्वेची साखळी खेचून रेल्वे थांबवली, हे जेव्हा गार्डला कळले तेव्हा त्याने त्या प्रवाशाला विचारले, "अरे बाबा, तू हे का केलेस? विनाकारण साखळी खेचून रेल्वे थांबवणे गुन्हा आहे, हे तुला माहीत नाही का?"
यावर तो भारतीय प्रवासी म्हणाला, "माझा असा अंदाज आहे की इथून एक फर्लांग अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले गेले आहेत." गार्डने त्याच्या रंगाकडे आणि कपड्यांकडे बघत अविश्वासाने विचारले, "अरे, तू काय अंतर्ज्ञानी आहेस काय? रूळ उखडल्याचे तुला कसे कळले?"
त्यावर तो प्रवासी उत्तरला, " साहेब माझ्या असे लक्षात आले आहे की गाडीच्या स्वाभाविक गतीमध्ये फरक पडतो आहे आणि रुळांचा जो आवाज येतोय त्यावरून मला पुढील संकटाचा अंदाज आला."
गार्डने त्या प्रवाशाला सोबत घेतले आणि तो रेल्वेच्या रुळांवरून पुढे चालायला लागला. त्या दोघांच्या मागून शेकडो प्रवासीदेखील काय झाले आहे हे बघण्यासाठी चालायला लागले. काहीच अंतर पुढे गेल्यावर गार्डला जे दिसले ते बघून तो स्तिमित झाला. त्याची मतीच कुंठित झाली. एका ठिकाणी रेल्वेचे रूळ जेथे जोडलेले होते तिथले नटबोल्ट निघून ते विखरून पडले होते. एक सेकंद जरी गाडी थांबायला उशीर झाला असता तर शेकडो प्रवाशांना त्यांचा जीव गमवावा लागला असता. लोकांना जेव्हा कळले की आपल्या प्राणांचा रक्षणकर्ता एक साधा दिसणारा भारतीय आहे, तेव्हा त्यांनी त्या प्रवाशाचे मनापासून आभार मानले. आणि त्याला विचारले, "तू कोण आहेस?" त्यावर त्या प्रवाशाने नम्रपणे सांगितले, "मी एक इंजिनियर आहे. आणि माझे नाव डॉ. एम. विश्वेश्वरय्या आहे."
ते नाव ऐकताच त्याची टिंगल करणाऱ्या इंग्रज प्रवाशांसह तो गार्डही स्तब्ध झाला. कारण तोपर्यंत केवळ देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा डॉ. विश्वेश्वरय्या यांचे नाव जाऊन पोहोचले होते. त्या इंग्रज प्रवाशांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांची माफी मागितली. तेव्हा विश्वेश्वरय्या म्हणाले, "तुम्ही माझ्याविषयी जे काही बोलत होता, त्यातला एकही शब्द मला आता आठवत नाही. त्यामुळे तुम्ही माझी उगाच कशाला माफी मागता? तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे झाले गेले विसरून जा."
हजारो लोकांचा जीव वाचवणारा आणि आपल्या शत्रूविषयी देखील क्षमाभाव बाळगणारा हा इंजिनियर म्हणजे आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेला महान अभियंता डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. विश्वेश्वरय्यांनी इंग्रजांचे आणखी कुठे गर्वहरण केले ते पुढच्या भागात बघूया.
COMMENTS