तिच्या नवऱ्याला तमाशाचा नाद होता. तसाच बायांचा पण नाद होता. एक दिवस तो तमाशातील एका नटरंगी बाईला घरी घेऊन आला. तिने त्या दोघांना घरात घे...
तिच्या नवऱ्याला तमाशाचा नाद होता. तसाच बायांचा पण नाद होता. एक दिवस तो तमाशातील एका नटरंगी बाईला घरी घेऊन आला. तिने त्या दोघांना घरात घेतले. आणि स्वतः घराच्या बाहेर गेली. घराला बाहेरून कडी लावून घेतली. त्या दोघांना निवांत एकांत मिळावा म्हणून तिने हे केले. ती बाहेर जात असतानाच भावजय पाण्याचा हंडा घेऊन आली. तर तिला अडवून ही म्हणाली, "दम जरा बाय. ते आत हायत." हे ऐकून भावजयीला चक्कर यायची वेळ आली.
नवऱ्याच्या सुखाचा इतका विचार करणारी ही बाई कोण होती? या बाईचे नाव होतं साळूबाई. साळूबाई ढसाळ. प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या त्या आई होत. हा प्रसंग घडला तेव्हा नामदेव ढसाळ यांचा जन्म झाला नव्हता.
हा प्रसंग लिहून ठेवला आहे नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मलिका अमर शेख यांनी. शाहीर अमर शेख यांची कन्या मलिका शेख यांनी कवी नामदेव ढसाळ यांच्याशी प्रेमविवाह केला होता. मलिका या सुद्धा प्रसिद्ध कवयित्री व लेखिका आहेत. लग्न करून सासरी गेल्यानंतर त्यांना हा किस्सा समजला तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले होते. त्यांनी 'मला उध्वस्त व्हायचंय' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. हे आत्मचरित्र वादग्रस्त ठरले. कारण त्यात त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात वाट्याला आलेली अनेक दुःखे मांडली आहेत. एक कवी मनाचा माणूस आपल्या बायकोशी किती निष्ठुरपणे वागला याचे चित्रण आहे. नामदेव ढसाळ यांच्या कविता कितीही गाजल्या असल्या आणि त्यांना कितीही प्रसिद्धी मिळालेली असली तरी त्यांच्यात एक प्रतिगामी पुरुषप्रधानता होती हे या पुस्तकातून मांडले आहे. एक प्रकारे त्यांच्या आयुष्याची काळी बाजू त्यात मांडली आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र वादग्रस्त ठरले.
याच आत्मचरित्रात त्यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ व त्यांच्या वडिलांच्या बाहेरख्यालीपणाबद्दल लिहिले आहे. या आत्मचरित्रातून भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीचे भेसूर वास्तव दिसून येते. स्वतः सुशिक्षित असूनही मलिका अमर शेख यांना पुरुषप्रधान व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. त्याचे प्रतिबिंब 'मला उध्वस्त व्हायचंय' या आत्मचरित्रात पडलेले दिसते.
हे आत्मचरित्र अमेझॉन वर उपलब्ध आहे. इथे क्लिक करून आपण ते खरेदी करू शकता.
COMMENTS